रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील घरावर जमावाचा हल्ला   

चौकशी समिती स्थापन

ढाका : बांगलादेशातील सिराजगंज जिल्ह्यात नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घरावर जमावाने हल्ला केला आणि तोडफोड केली.  या घटनेची चौकशी करण्यासाठी बुधवारी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. 
 
सिराजगंज जिल्ह्यातील शहजादपूर येथे असलेले कचरीबारी हे टागोर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर आणि महसूल कार्यालय आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी या हवेलीत राहून त्यांच्या अनेक साहित्यकृतींची निर्मिती केली.
 
रविवारी एक पर्यटक व्यक्ती त्याच्या कुटुंबासह कचरीबारी येथे गेली होता. तेथे दुचाकी पार्किंग शुल्कावरून प्रवेशद्वारावरील एका कर्मचार्‍याशी त्याचा वाद झाला. नंतर त्याला कार्यालयाच्या खोलीत डांबून ठेवण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी मानवी साखळी तयार करून घटनेचा निषेध केला. त्यानंतर जमावाने कचरीबारी या रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोरार्जित घरावर हल्ला केला आणि तोडफोड केली. संस्थेच्या संचालकांनाही यावेळी मारहाण करण्यात आली. 
 
या घटनेनंतर पुरातत्व विभागाने हल्ल्याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. या समितीला पुढील पाच दिवसांत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.दरम्यान, पोलिस तपासात संग्रहालयात कोणालाही डांबून  ठेवल्याचा पुरावा समोर आला नाही. हा जमाव गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्याची  तोडफोड करण्याचे कारस्थान रचत होता, असेही समोर आले आहे. 
 

Related Articles